नंदुरबार (प्रतिनिधी) मोईनोद्दीन शाह
पश्चिम आशियाई संकट, वाढते इंधनाचे दर आणि पर्यावरणाचा होत असलेला ऱ्हास या पार्श्वभूमीवर जिल्हा परिषद नंदुरबार कार्यालयाने ऊर्जा बचत आणि पर्यावरण संरक्षणासाठी एक अत्यंत महत्त्वाचा आणि आदर्शवत उपक्रम सुरू केला आहे. केंद्र व राज्य शासनाच्या निर्देशानुसार, जिल्हा परिषद नंदुरबार मुख्यालय व अधिनस्त पंचायत समिती कार्यालयांसाठी एक विशेष परिपत्रक जारी करण्यात आले आहे.
काय आहे हा पर्यावरणपूरक उपक्रम?
या मोहिमेअंर्तगत जिल्हा व तालुका स्तरावरील सर्व अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना इंधनाचा मर्यादित वापर करणे, सार्वजनिक वाहतुकीचा अवलंब करणे आणि पर्यावरणपूरक जीवनशैली अंगीकारण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
महत्त्वाच्या सूचना:
• दर सोमवारी 'नो व्हेईकल डे': आठवड्याच्या प्रत्येक सोमवारी सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांनी चारचाकी वाहनांचा वापर पूर्णपणे टाळावा.
• पर्यायी वाहनांचा वापर: कार्यालयात येण्यासाठी शक्यतो सायकल, ई-बाईक किंवा दुचाकी मोटरसायकलचा वापर करावा.
• अनावश्यक खर्चाला आळा: इंधनाचा अपव्यय टाळून देशाच्या आणि स्वतःच्या अर्थव्यवस्थेला हातभार लावणे.
पहिल्याच दिवशी अधिकाऱ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद!
आज सोमवार, दिनांक १८ मे २०२६ रोजी या मोहिमेची सुरुवात अत्यंत सकारात्मक पद्धतीने झाली. स्वतः मुख्य कार्यकारी अधिकारी नमन गोयल हे शासकीय गाडी बाजूला ठेवून ई-बाईक (E-Bike) वरून कार्यालयात दाखल झाले.
त्यांच्या पावलावर पाऊल ठेवत जिल्हा परिषदेतील वर्ग-१ च्या सर्व अधिकाऱ्यांनी शासकीय वाहनांचा वापर न करता दुचाकीवरून येणे पसंत केले. तसेच वर्ग-२, ३ आणि ४ च्या कर्मचाऱ्यांनी शेअरिंग रिक्षा, सार्वजनिक वाहने , सायकलचा वापर करून कार्यालय गाठले. याप्रसंगी सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांनी भविष्यातही दर सोमवारी ‘नो व्हेईकल डे’ पाळण्याची सामूहिक शपथ घेतली.
"ऊर्जा बचत आणि पर्यावरण संवर्धन ही केवळ शासनाची जबाबदारी नसून प्रत्येक नागरिकाची सामूहिक जबाबदारी आहे. वाढते इंधन दर आणि पर्यावरणीय बदल पाहता हा उपक्रम काळाची गरज आहे."
समाजासाठी एक मार्गदर्शक पाऊल
नंदुरबार जिल्हा परिषदेने प्रशासकीय पातळीवर राबवलेला हा उपक्रम केवळ शासकीय कर्मचाऱ्यांपुरता मर्यादित न राहता, संपूर्ण समाजाला पर्यावरणपूरक जीवनशैलीचा एक उत्तम संदेश देणारा ठरेल. शासकीय यंत्रणेने स्वतःपासून केलेली ही सुरुवात नक्कीच कौतुकास्पद आणि प्रेरणादायी आहे.

0 Comments