ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांनी मुंबईतल्या ब्रीच कँडी रुग्णालयात अखेरचा श्वास घेतला आहे. वयाच्या ९२ व्या वर्षी त्यांची प्राणज्योत मालवली. आपल्या चिरतरुण आवाजाने सगळ्या जगाला भुरळ घालणाऱ्या आशा भोसले या आज काळाच्या पडद्याआड गेल्या आहेत. आशा भोसले यांच्या छातीत संसर्ग झाल्याने त्यांना शनिवारी रात्री उशिरा ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. आज आशा भोसले यांचे पुत्र आनंद भोसले यांनी आशा भोसले यांच्या निधनाची माहिती दिली. उद्या दुपारी ४ वाजता आशा भोसले यांच्या पार्थिवावर अत्यंसंस्कार करण्यात येणार आहेत. त्यांच्या जाण्याने हिंदी चित्रपटसृष्टी, गायन क्षेत्र आणि कला क्षेत्रावर शोककळा पसरली आहे.
आनंद भोसले यांनी नेमकं काय सांगितलं?
आशा भोसले यांचे चिरंजीव आनंद भोसले यांनी ही माहिती दिली की त्यांची आई आणि ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांचं निधन झालं आहे. आशा भोसलेंचे अवयव निकामी होत गेले, त्यामुळे त्यांचं निधन झालं. आशा भोसले यांना शनिवारी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. आज त्यांची प्राणज्योत मालवली आहे. उद्या सकाळी ११ ते २ या वेळेत त्या लोअर पर या ठिकाणी त्यांचं पार्थिव अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात येणार आ दुपारी ४ वाजता शिवाजी पार्क या ठिकाणी त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत अशी माहिती आनंद भोसले यांनी दिली.
आशिष शेलार यांनी नेमकं काय म्हटलं आहे?
आज संपूर्ण देश आणि महाराष्ट्र आकंठपणे दुःखात बुडाला आहे. एका युगाचा अंत झाला आहे, आपल्या आशाताई आपल्यातून निघून गेल्या आहेत. आशाताईंचं असणं हे वर्षानुवर्षे समाधानाची अनुभूती देत होतं. आपण दुःखाला कवटाळून लोकांना आनंद देणं ही त्यांची खासियत होती. त्यांचं कर्तृत्व जगाला वेड लावणारं होतं. अशा आशाताई आज आपल्यात राहिल्या नाहीत. आता कुटुंबाने सांगितल्याप्रमाणे उद्या त्यांचं पार्थिव त्यांच्या लोअर परळ येथील निवासस्थानी ठेवण्यात येईल. तिथे लोकांना अंत्यदर्शन घेता येईल. त्यानंतर शिवाजी पार्क येथील स्मशानभूमीत त्यांचे अंत्यसंस्कार करण्यात येतील. शासकीय इतमामात त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येतील. त्यांचं नसणं हे आपल्याला आयुष्यभर दुःख देणारं आहे असं आशिष शेलार यांनी म्हटलं आहे.
सांगली या ठिकाणी आशा भोसले यांचा जन्म झाला होता. वयाच्या १० व्या वर्षापासून त्यांनी गायनाला सुरुवात केली होती. गिनिज बुकात सर्वाधिक गाणी गाणारी गायिका अशी त्यांची नोंद झाली आहे. आपल्या वेगळ्या आवाजाची भुरळ सगळ्या जगाला पडली होती. त्या जरी आपल्याला सोडून गेल्या असल्या तरीही त्यांचं गाणं कायमच आपल्या सोबत राहणार आहे. तो आवाज कायमच आपल्याला साथ देईल यात शंका नाही.
0 Comments