वाशिम जिल्ह्यात प्रशासनाची कडक मोहीम – जिल्हाधिकारी कुंभेजकर यांचा इशारा
वाशीम प्रतिनिधी
वाशिम, दहावी व बारावीच्या परीक्षा म्हणजे विद्यार्थ्यांच्या भवितव्याची गुरुकिल्ली! त्यामुळे या परीक्षा पूर्णतः पारदर्शक, निर्भय आणि शंभर टक्के कॉपीमुक्त वातावरणातच पार पाडल्या जातील, असा ठाम निर्धार जिल्हाधिकारी योगेश कुंभेजकर यांनी केला आहे.
केंद्र संचालक, पर्यवेक्षक व भरारी पथकांची आढावा बैठक घेताना त्यांनी स्पष्ट शब्दांत सांगितले की, कोणत्याही प्रकारचा गैरप्रकार, दबाव किंवा हलगर्जीपणा खपवून घेतला जाणार नाही. उपद्रवी केंद्रांवर विशेष नजर ठेवण्यात येणार असून, गरज पडल्यास तात्काळ कडक कारवाई करण्यात येईल.
यंदा वाशिम जिल्ह्यात तब्बल ४२ हजार ४२५ विद्यार्थी दहावी व बारावीच्या परीक्षेला सामोरे जाणार आहेत. बारावीची परीक्षा १० फेब्रुवारी ते १८ मार्च २०२६ तर दहावीची परीक्षा २० फेब्रुवारी ते १८ मार्च २०२६ दरम्यान होणार आहे.
परीक्षा केंद्रांवरील वर्गखोल्यांमध्ये सीसीटीव्हीद्वारे चोख बंदोबस्त ठेवण्यात येणार असून, वीजपुरवठा, पंखे, दिवे, जनरेटर यांसारख्या सर्व भौतिक सुविधा आधीच सज्ज करण्यात आल्या आहेत.
उपद्रवी केंद्रांवर अतिरिक्त भरारी पथके, पोलिस बंदोबस्त व प्रशासनाची विशेष नजर राहणार असून, परीक्षा काळात वाशिम जिल्हा पूर्णपणे “अलर्ट मोड”वर राहणार आहे.

0 Comments